विरार : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बावखळ पाडा येथील हुनमान मंदिरात लावण्यात येणारा बालविवाह मंगळवारी विरार पोलिसांनी उधळून लावला. यावेळी हजर असलेल्या पंचवीस जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून ३ जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये नवरदेवाचाही समावेश आहे.
एका अल्पयीन मुलीचा विवाह लावण्यात येत असल्याची माहिती एका स्वयंसेवी संस्थेने विरार पोलिसांनी दिली. त्यावरून पोलिसांनी बावखळ पाडा येथील हुनमान मंदिराकडे धाव घेतली. याठिकाणी एका 16 वर्षीय मुलीचा 28 वर्षीय तरुणाशी लग्न लावण्यात येत असल्याचे त्यांना आढळून आले. तात्काळ त्यांनी विवाह सुरू असताना तो थांबवला आणि मुलीची सुटका केली.
या प्रकरणी पोलिसांनी नवरदेव वसंत राठोड(28), नवऱ्या मुलाची आई झीमाबाई राठोड आणि मुलीचे वडील विजय जाधव यांना अटक केली. तसेच लग्नाच्या वेळी वऱ्हाडी म्हणून हजर असलेल्या 25 जणांवर बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 च्या कलम 9 आणि 11 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी हे वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धानिव बाग येथील बंजारा वसाहतीत राहतात. मुलीच्या मर्जीविरोधात हे लग्न लावून देण्यात येत होते, अशी माहिती सुत्रांनी दिली.



Post A Comment:
0 comments so far,add yours