मुंबई, ता. 3 सप्टेंबर : जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज धूम असणार आहे ती दहीहंडीची. वर्षभर तरूण ज्या दिवसाची वाट बघत असतात तो दिवस म्हणजे दहीहंडी. सळसळता उत्साह, धाडस, संस्कृती आणि खेळ या या सगळ्यांचं एकत्रित रूप म्हणजे हा खेळ आहे. ठाणे आणि मुंबईतले सर्व रस्ते आज गोविंदा पथकांच्या स्वाऱ्यांनी ओसंडून वाहत जाणार आहेत. मुंबई आणि ठाण्यात अनेक गोविंदा पथकं असून दहीहंडीच्या दोन महिन्यांआधीपासून त्यांचा सराव सुरू असतो. उंच थर लावून हंडी फोडून तो विक्रम आपल्या नावावर करण्याचा सर्व गोविंदा पथकांचा प्रयत्न असतो. यात तरूणीही मागे नसून खास महिलांची गोविंदा पथकं प्रसिद्ध झाली आहेत.

मुंबई, ठाण्यातल्या या उत्सवाला सध्या कॉर्पोरेटचं रूप आलं असून राजाश्रय मिळत असल्यानं त्याची उलाढाल काहीशे कोटींवर गेली आहे. जवळपास सर्वच राजकीय नेत्यांनी आपापल्या प्रतिष्ठांव्दारे दहीहंडीचं आयोजन केलं असून लाखोंची बक्षिसं ठेवून तरूणांना आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. संगीत, गाणी, वाद्य, यांचा मेळ घातला गेल्याने लोकांचं मनोरंजनही भरपूर होत असतं.

अनेक मंडळं बॉलीवूडच्या कलाकारांना या उत्सवासाठी आमंत्रित करीत असल्यानं दहीहंडी उत्सवाला ग्लॅमरही मिळालं आहे. मात्र उंच थर लावून दहीहंडी फोडण्याचा कल वाढत असल्यानं त्या विरूद्ध काही जण कोर्टात गेले आणि बक्षीसाचं अमिष दाखवून उंच थर लावण्याच्या प्रयत्नांना सुप्रीम कोर्टानं जोरदार चाप लावलाय. उंच थरांवर बंधणं आलीत. या उत्सवाला साहसी क्रीडा प्रकार म्हणून मान्यता देण्याची मगणीही दरवर्षी होत असते.

बेफाम उत्साह आणि फाजील धाडस यामुळं काळजी न घेता खेळल्याने दहीहंडीचे थर लावताना दरवर्षी अपघातही होतात. त्यात अनेकजण जायबंदी होतात तर काही जणांना आपला जीवही गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे खेळताना पूर्ण काळजी घेण्याचं आवाहन पोलीस आणि प्रशासनाने केलं आहे. त्यामुळं आनंदावर विरजण पडणार नाही आणि निर्विघ्न उत्सव पार पडेल.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours