जालना, 4 मार्च : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात मध्यस्थी करण्यासाठी आता भाजपकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. या दोघांमधील दिलजमाईसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख हे रावसाहेब दानवेंना घेऊन खोतकरांच्या दर्शना बंगल्यावर दाखल झाले आहेत. या तिघांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. 
जालना लोकसभा मतदार संघाच्या मैदानातून मी अजून बाहेर पडलो नसल्याचे खोतकर यांनी म्हटलं होतं. तसंच याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो असून त्यांना भेटणार असल्याचेही खोतकरांनी म्हटले होते. त्यामुळे खोतकर जर या मतदारसंघातून उभे राहिले तर दानवेंसाठी ती मोठी डोकेदुखी ठरू शकते. कारण खोतकरांचा या मतदारसंघात जनसंपर्क असल्याचं बोललं जातं. त्यामुळे ते दानवेंना चांगलीच टक्कर देऊ शकतात. म्हणून त्यांना रोखण्यासाठी आता दानवेंनी प्रयत्न होताना दिसत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर एकाच मंचावर आले होते. पण तिथेही अर्जुन खोतकर यांनी आपण जालना लोकसभेच्या मैदानात असल्याचे म्हटले होते.
स्वबळाचा निर्धार करणारी शिवसेना आणि पटक देंगेचा इशारा देणारी भाजपा अखेर एकत्र आली. पण असं असलं तरीही स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये गेल्या पाच वर्षांत तयार झालेला संघर्ष हा या दोन्ही पक्षांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. कारण युतीच्या घोषणेनंतर शिवसेनेचे अर्जुन खोतकर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात उभे राहण्यावर ठाम आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours