मुंबई, 8 मार्च : विदर्भाच्या विकासाचा झपाटा पाहता स्वतंत्र विदर्भ मागण्याची गरजच राहिली नाही, अशी भूमिका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने मांडली आहे. त्यांच्या या भूमिकेचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून कौतुक केले आहे.
बुधवारी (6 मार्च)नागपुरात नितीन गडकरी यांची जाहीर सभा होती. या सभेदरम्यान 'स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे, जय विदर्भ' अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून सुरू होती. या गोंधळी कार्यकर्त्यांना गडकरींनी फैलावर घेत 'आवाज केला तर ठोकून काढू, बसा खाली', असा आक्रमक इशारा दिला.
गडकरींच्या या भूमिकेचे सामना संपादकीयमधून जाहीर कौतुक करण्यात आले आहे.
''गडचिरोलीपासून नागपूरपर्यंत आणि बुलढाणा, यवतमाळपासून अमरावतीपर्यंत सगळीकडे विकासाची घोडदौड सुरू असताना वेगळ्या विदर्भाची कावकाव कोणी करीत असेल तर गडकरी म्हणतात त्याप्रमाणे त्यांना ठोकूनच काढायला हवे. विदर्भाच्या विकासाचा हा झपाटा पाहता स्वतंत्र विदर्भ मागण्याची गरजच राहिली नाही, अशी भूमिका गडकरींनी आता मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने मांडली आहे. या बदलाचे स्वागत करून अखंड महाराष्ट्राने नितीन गडकरींचे जाहीर अभिनंदन केलेच पाहिजे!'', अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी गडकरींच्या भूमिकेचं कौतुक केले आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours