मुंबई: दादर रेल्वे स्टेशनच्या नामांतराचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. दादर रेल्वे स्टेशनला डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचं नाव द्या, अशी मागणी करत भीम आर्मी या संघटनेनं दादर स्टेशनवर पोस्टर्स चिकटवली आहेत. विशेष म्हणजे भीम आर्मीच्या या मागणीला बाबासाहेबांचे नातू आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी विरोध केला आहे.
चैत्यभूमीत पुण्यतिथी निमित्त बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी लाखो भीमसैनिक दाखल झाले आहेत. अशातच भीम आर्मीनं दादर स्टेशनवर नामांतरासाठी आंदोलन केलं आहे. आंदोलकांनी स्टेशनवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्थानक असे नामफलक चिकटवले आहेत. 
प्रकाश आंबेडकरांचा मागणीला विरोध
महापरिनिर्वान दिनाच्या निमित्ताने भीम आर्मीने दादर स्टेशनच्या नामांतराचं आंदोलन केलं असलं तरीही प्रकाश आंबेडकर यांनीच त्याला विरोध दर्शवला आहे. मुंबईच्या सात बेटाचा ऐतिहासिक वारसा कायम राखला जावा, अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली आहे.
नेमका काय आहे दादर स्टेशनच्या नामांतराचा वाद?
-दादर स्टेशनच्या नामांतराची 25 वर्षांपासूनची मागणी 
-नामांतरासाठी दलित संघटनांनी अनेकदा आंदोलनं केली
-2011 साली राष्ट्रवादीने नामांतराचा प्रस्तावही मांडला
-दादर स्टेशनला चैत्यभूमी असा होता नामांतराचा प्रस्ताव
-पण बाळासाहेब ठाकरेंनी नामांतरास केला होता विरोध
-विरोधामुळे नामांतराचा प्रस्ताव पुन्हा बारगळला
दरम्यान, देशात सध्या नामांतराचं खूपच वारं वाहत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नामांतराच्या मोहिमेत सर्वाधिक पुढे आहेत. इकडे महाराष्ट्रातही औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामांतर करण्यासाठीचा वाद जुनाच आहे. त्यात आता आणि दादर स्टेशनच्या नामांतर आंदोलनानेही पुन्हा नव्याने उचल खाल्ली असल्याचं चित्र आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours