मनमाड, 12 मार्च : हातावरील शिवबंधन तोडून घड्याळ बांधल्यानंतर राजकीय पटलावर चर्चेत आलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका संपताच मालिका विश्वातून काही काळसाठी निवृत्ती घेणार असल्याची घोषणा नाशिकच्या मालेगावात केली. कोल्हे यांनी अचानकपणे केलेल्या या घोषणेमुळे मराठी सिनेसृष्टीसोबत राजकीय क्षेत्रातील लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड हे नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील कौळाने येथील भूमिपुत्र असल्याने दरवर्षी त्यांचा जन्मोसोहळा साजरा केला जातो. यंदा ही त्यांचा 156 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांना महाराजा सयाजी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
तर सनदी अधिकाऱ्यांच्या मातांचादेखील सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ. कोल्हे यांनी  मालिका विश्वातून काही काळासाठी निवृत्ती घेणार असल्याची घोषणा करण्या बरोबरच ‘स्वराज्यरक्षक’च्या धर्तीवर महाराजा सयाजीरावांच्या जीवनावर एखादी मालिका, नाटक, चित्रपट करण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं
लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्याच्या दुसर्‍याच दिवशी अमोल कोल्हे पुरस्कार सोहळ्यानिमित्त मालेगावी आले होते. तत्पूर्वीच, त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते शिरुर लोकसभा मतदार संघातून उभे राहणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours