मुंबई, 10 मार्च : लोकसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. सर्वच पक्षात आयाराम आणि गयारामांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपूत्र सुजय विखे पाटील यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 12 मार्चला ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुजय विखेंचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.
सुजय विखे पाटील हे अहमदनगरमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. परंतु, नगरची जागाही राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. सुरुवातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरची जागा काँग्रेसला देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु, पवारांनी नंतर यु-टर्न घेतला. त्यामुळे सुजय विखे पाटलांच्या निवडणूक लढवण्याबाबत सस्पेंन्स निर्माण झाला होता.
अखेर हा प्रश्न दिल्लीच्या कोर्टात पोहोचला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यात लक्ष घालण्याची शक्यता आहे. या जागेबाबतचा तोडगा काढण्यासाठी राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खरगे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत दिल्लीत चर्चा करतील, अशी माहिती आहे. दिल्लीत सोमवारी होणाऱ्या बैठकीत राहुल गांधी दक्षिण नगरच्या जागेबाबत चर्चा करणार आहेत. औरंगाबाद आणि नगर या जागांबाबत आघाडीचा अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही.
परंतु, यावर कोणताच निर्णय निघत नाही अशी शक्यता निर्माण झाली होती. . भाजपमधून तिकीट मिळावं यासाठी सुजय विखे प्रयत्नशील होते. यासंदर्भात भाजपचे गिरीश महाजन आणि सुजय विखे यांच्यामध्ये नुकतीच बैठक झाली आहे. अखेर सुजय विखे पाटलांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 12 मार्च रोजी मुंबईत सुजय विखे पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.



Post A Comment:
0 comments so far,add yours