10 मार्च : अहमदनगरच्या लोकसभा मतदारसंघाबाबत आता थेट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लक्ष घालण्याची शक्यता आहे. या जागेबाबतचा तोडगा काढण्यासाठी राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खरगे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत दिल्लीत चर्चा करतील, अशी माहिती आहे.
दिल्लीत सोमवारी होणाऱ्या बैठकीत राहुल गांधी दक्षिण नगरच्या जागेबाबत चर्चा करणार आहेत. औरंगाबाद आणि नगर या जागांबाबत आघाडीचा अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. 
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव असलेले सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीकडून ही जागा लढवावी असा प्रस्ताव राष्ट्रवादीने दिल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र सुजय विखे पाटील राष्ट्रवादीत जाण्यास फार इच्छुक नाहीत असं कळतंय. त्यामुळे आता आघाडीत वाद असलेल्या या लोकसभा जागांवर सोमवारी दिल्लीत तोडगा निघणार का, याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुजय विखे हे भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू आहेत. भाजपमधून तिकीट मिळावं यासाठी सुजय विखे प्रयत्नशील आहेत. यासंदर्भात भाजपचे गिरीश महाजन आणि सुजय विखे यांच्यामध्ये नुकतीच बैठक झाली आहे. 
दुसरीकडे, राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये गुप्त बैठका सुरू असल्याच्या चर्चा रंगत असताना 'मी विखेंना भेटलोच नाही' असं शरद पवार म्हणाले. त्यामुळे सुजय विखेंच्या उमेदवारीबाबत अजूनही संभ्रम आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours